‘निर्बंधांबाबत मुंबईला एक आणि पुण्याला वेगळा न्याय का?’
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव
🎴पुणे : दि. ०३ : करोना संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने २२ जिल्ह्यातील निर्बंध शिथील केले आहेत. तर,ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होतेय अशा १४ जिल्ह्यांमध्ये अजूनही कठोर निर्बंध आहेत. यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. यावरुन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. निर्बंधांबाबत मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? असा सवाल मोहोळ यांनी केला आहे.
राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत सोमवारी नवी नियमावली जाहीर करताना करोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवले. तर, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांचा निर्णय़ स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सोपवला. तर, २२ जिल्ह्यांमध्ये काही अंशी सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री करोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहोत. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे, असं इशारा मुरलीधर मोहोळ यांनी सरकारला दिला आहे.

