मोतीतलावात कचऱ्याचे प्रमाण वाढले; तलावाकाठी दुर्गंधी चे साम्राज्य
*सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी शहराची शान आणि प्राचीन काळापासून ओळख असलेला मोती तलाव सद्य स्थितीत कचऱ्याचे तुडुंब भरून वाहत असून, तळ्याच्या काठी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यापूर्वी नगरपालिकेकडे पावसाळ्यापूर्वी ची कामे करताना गटार साफसफाई केली जात होती. त्यामुळे कचरा कमी प्रमाणात वाहून तळ्यात येत असे . काही दिवसांवर नारळी पौर्णिमा येत असून, त्यामुळे तातडीने मोती तलाव आणि सर्व परिसर स्वच्छ करून कचरा मुक्त करावा अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. शुभांगी सुकी यांनी केली आहे.
तसेच शहरात डासांचे प्रमाण वाढले असून, सावंतवाडीच्या जवळ असलेल्या बांदा येथे काही दिवसापूर्वी डेंग्यू चे रुग्ण सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे मत देखील त्यानी व्यक्त केले आहे.

