◾कोरोना संकट संपेपर्यंत धान्य दुकानदारांना स्वतःच्या थंबनी धान्य वाटप पॉस मशीन द्वारे करण्याची परवानगी मिळावी ; अशोकराव कदम
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-१७ :- राज्यातील पर्यायाने रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत धान्य दुकानदारांना स्वतःच्या थंबने धान्य वाटप पॉस मशीनद्वारे करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केली आहे.
देशात कोरोनाने हाहाकार उडाला असून रत्नागिरी जिल्ह्यात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे शासन- प्रशासनासमोर कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षी पासून सुरू झालेल्या कोरोना परिस्थितीनंतर रेशनिंग दुकानदार संघटनेने काही मागण्या शासनाकडे केल्या होत्या. या मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकान मालक- चालक रॉकेल एजन्सी धारकांना विमा संरक्षण व्हावे याच बरोबर कोकण विभागीय वरिष्ठ उपायुक्तांकडून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना रेशन दुकानदारांसाठी हॅन्डग्लोज, मास्क, सॅनिटायझरचे पुरवठा होण्यासंदर्भात आदेश व्हायला पाहिजे होते, ते आदेश अद्याप झालेले नाहीत. तसेच शासन प्रशासनाकडून पारदर्शकपणा ची अपेक्षा ठेवली जाते मात्र कमिशन देण्याबाबत पारदर्शकता ठेवली जात नाही. एकंदरीत धान्य दुकानदारांना मिळणारे धान्य विक्रीचे कमिशन वेळेत मिळावे, अशी मागणी अशोकराव कदम यांनी केली आहे. कमिशन वेळेत मिळत नसल्यामुळे रेशन दुकानदारांनाआर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे,असे नमूद केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील धान्य दुकानदारांना शासनाच्यावतीने देण्यात आलेली ई-पॉस मशीन मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त होत आहेत. त्याचबरोबर मशीनच्या बॅटऱ्या देखील नादुरुस्त होत आहेत. याबाबत वारंवार मागणी करून देखील मशीन अथवा बॅटऱ्यांबाबत निर्णय झालेला नाही. एकंदरीत शासन -प्रशासनाने आमच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केली आहे.

