उबाठा सेना कार्यकर्ता मारहाण, भाजपच्या तिघांना अटक
उबाठा सेना कार्यकर्ता मारहाण, भाजपच्या तिघांना अटक
कणकवली –
कणकवली लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर बेर्ले गावचे माजी सरपंच तथा उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते रामचंद्र बाळकृष्ण राऊत (५८) यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या संशयितांपैकी बांधकाम माजी सभापती रवींद्र उर्फ बाळा कांतिलाल जठार (५३, शिडवणे), माजी सभापती दिलीप नंदकुमार तळेकर (४५, तळेरे), वारगांव उपसरपंच नारायण उर्फ नाना रामचंद्र शेट्ये (४३, वारगांव) यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयितांतर्फे
ॲड उमेश सावंत यांनी काम पाहिले.फिर्यादीनुसार सदरची घटना शेर्पे येथे ७ मे रोजी सायंकाळी ६.१५ वा. सुमारास घडली होती. राऊत यांनी शेर्पे येथील रेशन दुकान बंद केले. त्यानंतर ते काहींसमवेत तेथील एका चहाच्या टपरीवर होते. त्याचवेळी दोन कारमधून रवींद्र जठार, दिलीप तळेकर, नारायण शेट्ये यांच्यासह १० ते १५ जण उतेरले. त्यांनी रामचंद्र राऊत यांना ‘तू विनायक राऊत साहेबांचा प्रचार करतो, तुला मस्ती आली आहे का?’ असे बोलत हाताच्या थापटांनी, लाथाबुक्यांनी, काठ्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शर्टच्या खिशातील ३ हजार ५० रुपयांची रक्कम चोरली, अशी फिर्याद राऊत यांनी दिली होती. त्यानुसार संशयितांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सशर्त अटींवर जामीन मंजूर केला.

