वन्यप्राणी उपद्रव वाढल्याने बोंबाबोंब आंदोलन छेडणार!
वन्यप्राणी उपद्रव वाढल्याने बोंबाबोंब आंदोलन छेडणार!
मनसे कार्यकर्त्यांचा वन विभागाला इशारा
सावंतवाडी
न्हावेली गावात वन्यप्राण्यांचा हैदोस तसेच उपद्रव वाढला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेती बागायतीचे अतोनात नुकसान झाले असून याबाबत काहीच दखल न घेणाऱ्या वनविभागाच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देण्यात आला आहे. न्हावेली गावात गेली काही वर्षे गवारेड्यांनी शेती, बागायती तसेच काजू, आंबा झाडांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच दिवसाढवळ्या गावात बिबट्या, वाघ यांचा संचार पाहायला मिळतो. वाघाने वासरू मारल्याची घटना ताजी असताना आता राजू परब यांच्या वासराची शिकार केल्याचे उघड झाले आहे. वनविभाग आता माणसाचा मृत्यू होण्याची वाट पाहत
आहे का, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
याची दखल न घेतल्यास वन अधिकाऱ्यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ, असा इशारा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि मनसे विद्यार्थी सेना पदाधिकारी चेतन पार्सेकर व न्हावेली ग्रामस्थांनी दिला आहे. तिरोडा, नाणोस, गुळदुवे येथे बिबट्याचा संचार वारंवार आढळत असताना त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. मनसेने वनविभागावर धडक दिली. मात्र, वनविभागाचे अधिकारी कार्यालयीन कामाचे कारण देऊन गायब झाले. त्यामुळे लवकरच मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली व विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बोंबाबोंब आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे.
