डीवायएसपी कार्यालयात माहिती अधिकार फलक लावा !
सावंतवाडी येथील उपविभागीयपोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंकी यांच्या कार्यालयात राज्य जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांचे फलक व अन्य माहिती लावण्यात आलेली नाही, याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी लक्ष वेधले आहे.
महिती अधिकार अधिनियम २० डिसेंबर २००५ रोजी लागू झाला आहे. यामधील कलम ५ (१) मध्ये असे नमूद आहे की, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून १०० दिवसांच्या आत या अधिनियमान्वये माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तींना माहिती देण्यासाठी त्यांच्या अखत्यारितील सर्व प्रशासकीय युनिटमध्ये किंवा कार्यालयात आवश्यक असतील तेवढ्या जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना यथास्थिती केंद्रीय माहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित करेल.
२००५ पासून किंवा सदर कार्यालय स्थापन झाल्यापासून फलक लावला गेला पाहिजे होता. मात्र, तो लावला गेलला नाही, याकडे बरेगार यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी बरेगार यांनी निवेदनात केली आहे.

