कसाल मंडल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला फासला हरताळ…
कसाल मंडल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला फासला हरताळ…
आंब्रड येथील दोन महिने उलटले तरी रस्ता खुला करण्यास टाळाटाळ;अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागली दाद..
कणकवली दि.१ ऑगस्ट
तहसीलदार कुडाळ यांचे न्यायालयातील क्र . फौजदारी / पायवाट रस्ता / अर्ज क्र . ०६/२०२१ श्री . विनोद वासुदेव मसुरकर वगैरे ३ विरुद्ध बळीराम महादेव रांबाडे या दाव्यातील मे मामलेदार अमोल पाठक यांनी २ मे २०२२ रोजी वाट – रस्ता दोन दिवसांत खुला करून देण्याकरीता पारित अंतरिम आदेश मंडल अधिकारी कसाल यांना दिला.मात्र,त्या आदेशाला दोन महिने उलटले तरी अद्यापही कार्यवाही कसाल मंडल अधिकारी दिनेश तेली यांनी केली नाही.एकार्थाने कसाल मंडल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला हरताळ फासला आहे.अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनोद वासुदेव मसुरकर यांनी महसूल दिनादिवशी तक्रार केली आहे.
मंडळ अधिकारी कसाल , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग हे मामलेदार कुडाळ यांनी पारित केलेल्या आदेशाची अमलबजावणी करणेस टाळाटाळ करीत आहेत. विनोद वासुदेव मसुरकर , उत्तम लवू मसुरकर ,गजानन केशव हरमळकर , विठोबा पांडुरंग मसुरकर रा . आंब्रड ( वीराचीवाडी ) , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग आम्ही वरीलप्रमाणे गाव मौजे आंब्रड ( वीराची वाडी ) , ता . कुडाळ , जि . सिंधुदुर्ग येथील रहिवाशी आहोत . आम्ही जवळपास मागील ७० वर्षे आमचे घराकडे जाणे – येणेसाठी वापरत असलेला रस्ता वरील संदर्भीय प्रकरणातील प्रतिवादी श्री . बळीराम महादेव रांबाडे यांनी कुंपण घालून बंद केला . त्यामुळे आमची घराकडे जा – ये करणेची अडचण निर्माण झाली म्हणून आम्ही दि . २ ९ जानेवारी २०२१ रोजी मा . तहसीलदार , कुडाळ यांचेकडे रस्ता खुला करून मिळणेबाबत अर्ज केला होता . सदर अर्ज दि . ०८ नोव्हेंबर २०२१ रोजी निकाली काढण्यात आला .
त्यानंतर श्री . रांबाडे यांना पुन्हा सदर जाणेयेणेच्या रस्त्यावर कुंपण घालून जेसीबीच्या सहाय्याने मोठा चर खणून आमच्या रहदारी व वहिवाटीत असणारा रस्ता बंद केला . हा प्रकार आम्ही आंब्रड गावचे सरपंच व उपसरपंच यांच्या देखील निदर्शनास आणून दिला होता . आम्ही श्री . रांबाडे यांना खूप समजविण्याचा प्रयत्नकरून पाहिला मात्र श्री . रांबाडे व त्यांची मुले आमच्याशी अरेरावी करून शिवराळ भाषेत बोलू लागली . आम्ही सामोपचाराने प्रकरण मिटवायचे अनेक प्रयत्न केले परंतु श्री . रांबाडे यांनी त्याला दाद दिली नाही . त्यामुळे आम्हाला मामलेदार कायद्याखाली संदर्भीय दावा दाखल करण्यावाचून कोणताही मार्ग उरला नव्हता . संदर्भीय प्रकरणामध्ये मा . मामलेदार न्यायालयाने वर नमूद प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंनी सादर केलेली कागदपत्रे व युक्तिवाद ऐकून दि . ०२ मे २०२२ रोजी अंतरिम आदेश पारित करून प्रतिवादी श्री . रांबाडे यांना आदेशाची प्रत मिळालेपासून दोन दिवसाचे आत बंद केलेला रस्ता खुला करून देण्याबाबत आदेशित केले . तसेच , जर प्रतिवादी श्री . रांबाडे यांनी दोन दिवसांत रस्ता खुला केला नाही , तर मंडळ अधिकारी , कसाल यांनी रस्ता खुला करून द्यावा असे आदेश दिले आहेत .
सदर रस्ता परिसरातील रहिवाशी त्यांचे घराकडे जाणे येणेसाठी किमान ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून कोणाचेही कसलेही अडथळा व तक्रारीशिवाय वापर करीत आलेले आहेत . सदर रस्त्याचा वापर शेतात , बाजार , शाळा , रुग्णालयात वा तदनुषंगिक कारणांकरिता केला जातो . श्री . रांबाडे यांनी मा . मामलेदार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे दोन दिवसात रस्ता खुला केलेला नाही . म्हणून आम्ही मंडळ अधिकारी , कसाल यांचेशी वेळोवेळी संपर्क करून मा . मालेदार , कुडाळ यांचे आदेशाप्रमाणे आमचा जाणे – येणेचा मार्ग खुला करून द्यावा अशी अनेकदा विनंती केली . मात्र मंडळ अधिकारी , कसाल हे नेहमीच आम्हाला वेगवेगळी कारणे देऊन आमची बोळवण करीत असतात व सदर आदेशाची अंमलबजावणी करणेस जाणीवपूर्वक पुर्वक टाळाटाळ करतात . मा . मालेदार साहेब , कुडाळ यांचा आमचा जाणे – येणेचा मार्ग खुला करून देण्याचा स्पष्ट आदेश असताना देखील मंडळ अधिकारी , कसाल हे आदेशाची अंमलबजावणी न करून न्यायालयाचा अवमान व अपमान करीत आहेत . तसेच , मे .. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी वेळेत न झाल्यामुळे , मे . न्यायालयाकडून
न्याय मिळून देखील , अकार्यक्षम मंडळ अधिकारी , कसाल यांचेमुळे आमच्यावर अन्याय होत आहे .
सदरचा रस्ता प्रतिवादी श्री . बळीराम महादेव रांबाडे यांनी आमच्या रहदारीसाठी बंद केल्यामुळे आमची होणारी गैरसोय याची मंडळ अधिकारी यांना चांगलीच माहिती आहे . आमचा जाणे – येणेचा / रहदारीचा रस्ता खुला करून मिळणे हे किती निकडीचे आहे याची देखील कल्पना मंडळ अधिकारी यांना आहे . तसेच , मे . न्यायालयाचा आदेश असताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करण्याची हिंमत मंडळ अधिकारी कशी काय करू शकतात याचे आश्चर्य वाटते . मे . न्यायालयाचा आदेश असताना देखील मंडळ अधिकारी , कसाल हे त्या आदेशाची अंमलबजावणी न करता आमचेवर अन्याय करीत आहेत . सबब , श्री . दिनेश तेली , मंडळ अधिकारी , कसाल यांना मा . मामलेदार साहेब , कुडाळ यांनी दि . ०२ मे २०२२ रोजी पारित केलेल्या आदेशाची ताबडतोब अंमलबजावणी करणेकरिता आदेश देण्यात यावेत व आजपर्यंत त्यांचेकडून मे . मामलेदार न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी का केली गेली नाही याबाबत कारणे दाखवा ( Show Cause Notice ) देण्यात यावी , अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

