कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑 आरोग्य विभागाने बालकांच्या आरोग्य तपासणीबरोबरच समुपदेशन करावे..

🛑 कौशल्य विकास विभागाने विधवा महिला, 18 वर्षापुढील मुलांना प्राधान्य द्या ; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२८ :- कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करावे. कौशल्य विकास विभाग आणि आरसेटीने प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांची यादी अंतिम करताना विधवा महिला तसेच पालक गमावलेल्या 18 वर्षापुढील बालकांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.

कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा स्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी संजित महोपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. दीपक म्हालटकर, पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांचे निर्देश –

* बालकांना धान्य वितरण करा. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्राधान्य द्या.

* संजय गांधी, इंदिरा गांधी अशा शासकीय योजनांचे लाभ विधवा महिला, बालकांना देण्याबाबत तहसिलदारांना सूचना

* नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील मुलांना वैयक्तिक भेट देऊन विचारपूस करावी. सामाजिक संघटनांच्या मदतीने या मुलांना शिकवण्यासाठी तसेच इतर आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करावेत.

* मुलांच्या करिअर मार्गदर्शनासाठी आवश्यक प्रयत्न व्हावेत.

* उत्पन्नाचे दाखले देण्याबाबत तहसिलदारांना पत्र पाठवावे. त्याशिवाय तालुकानिहाय प्रलंबित दाखल्यांची यादी द्यावी.

पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांच्या सूचना

* एका पालकाचा कोविडने मृत्यू झाला आहे आणि दुसऱ्या पालकाचा अन्य कारणाने मृत्यू झाला असल्यास याची माहिती पोलीस विभागाने घ्यावी.

* आरोग्य विभागाने विशेषतः महिला समुपदेशकांनी 14 वर्षांपुढील मुलींशी भेटून विचारपूस करून त्यांच्या वैयक्तिक समस्यांबाबत समुपदेशन करावे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी विषय वाचन करून माहिती दिली. जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 13 असून, एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 188 आहे. 256 विधवा महिला आहेत. बैठकीला कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त सुनील पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, शिवराज गायकवाड, नितीन गाढवे, सुरज कांबळे, अवधुत तावडे, संतोष जिरगे, जयंत जावडेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!