पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित; विद्यार्थी-पालक संभ्रमात
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव
🎴पुणे: दि २० : शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता शिष्यवृत्तीच्या परीक्षेबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे लाखो विद्यार्थी-पालक संभ्रमात आहेत.
राज्यात ऑनलाइनद्वारे शाळा सुरू (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) झाल्या असल्या तरीही अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेत आहेत. गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन, ऑफलाइनद्वारे विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिल या एकाच दिवशी घेण्यात येणार होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा २३ मे रोजी घेण्यात येईल, असे मार्चच्या अखेरीस जाहीर करण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे परीक्षा परिषदेने १० मे रोजी स्पष्ट केले. त्यानंतर जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला, तरीही अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक गोंधळलेले आहेत.

