◾मळेवाड नाईकवाडी येथिल बंधाऱ्यावर पावसामुळे साचलेल्या गाळाची ग्रामस्थांनी श्रमदानाने साफसफाई करत केला पाण्याचा प्रवाह सुरळीत..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
- ✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.२४-: सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील जकातनाका नाईकवाडी येथील बंधाऱ्यावर पावसामुळे साचलेल्या गाळाची ग्रामस्थांनी श्रमदानाने साफसफाई करत पाण्याचा प्रवाह सुरळीत केला.
मळेवाड गावातील जकातनाका नाईकवाडी नदीवर पक्का बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतकरी शेती बागायतीसाठी करत असत होते. मात्र नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्री वादळ व पावसामुळे येथील बाग बागायतीला बराच मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
जोरदार पावसामुळे येथील नदी नाल्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाणी आजूबाजूच्या शेती बागायतीत शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने आजूबाजूची शेत जमीन खचून गेली आहे. तसेच पावसाच्या पाण्याबरोबर आजूबाजूचा कचरा, गाळ बंधाऱ्यावर साचल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे येथील नाईकवाडीतील ग्रामस्थांनी याची तात्काळ दखल घेऊन नदीवरील बंधाऱ्यावर साचलेला गाळ, कचरा बाजूला करून पाण्याचा प्रवाह सुरळीत केला. या श्रमदानात नाईक नाईकवाडीतील ग्रामस्था सहभागी झाले होते. यावेळी अचानक झालेल्या पुर सदृश्य पाण्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

