◾राज्य शासनाने नव्याने ८ ते १५ दिवसांच्या लॉकडाऊनची चाचपणी केली सुरू ; मात्र व्यापारी संघटना सोमवार पासून सर्व दुकाने खुली करण्याच्या निर्णयावर ठाम..
◾कोरोनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करून जिल्ह्यातील व्यापारी बांधव आपला व्यवसाय सुरू करणार ; जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव नितीन वाळके यांची माहिती..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग,दि-११ :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने नव्याने ८ ते १५ दिवसांच्या लॉकडाऊनची चाचपणी सुरू केली असताना राज्यातील व्यापारी संघटना मात्र सोमवार पासून सर्व दुकाने खुली करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवार पासून सिंधुदुर्गातील सर्व दुकाने खुली करण्यात येणार असून कोरोनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करून जिल्ह्यातील व्यापारी बांधव आपला व्यवसाय सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव नितीन वाळके यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेऊन शनिवार, रविवार संचारबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी वर्गात नाराजी असून सोमवार पासून राज्यातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय राज्यातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने देखील हा निर्णय जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने सोमवार पासून जिल्ह्यातील सर्व दुकाने खुली करणार असल्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांनी गतवर्षीच्या कोरोना टाळेबंदीत महाराष्ट्र शासनाने वेळोbवेळी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करीत शासन व प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अर्थचक्र हे एप्रिल ते जून या कालावधीतील व्यापार उदीमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, मच्छिमार, बागायतदार,वाहतूकदारा पासून हातावर पोट असलेल्या श्रमिका पर्यंत सर्वाच्याच दृष्टीने हे तीन महिने पुढील पावसाळ्याच्या बेगमीचे असतात हे सर्वज्ञात आहे. याच काळात जर सर्वंकष टाळेबंदीचे पाऊल उचलले गेले तर ‘गेल्या वर्षीच्या टाळेबंदीतून आत्ता कुठे सावरू पहात असलेला’ हा महत्वाचा समाज घटक पुरता मोडून पडेल आणि मग भविष्यात कधीच सावरू शकणार नाही. त्यामुळे सोमवार पासून सर्व दुकाने सुरू करताना शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्व नियमाचे काटेकोर पालन जिल्ह्यातील व्यापारी करतील. दोन दिवसांवर गुढीपाडवा, आंबेडकर जयंती हे सण असून या कालावधीत बाजारपेठेत मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याचे देखील महासंघाचे सचिव नितीन वाळके यांनी म्हटले आहे.

