◾ग्रामीण भागातील शेतकरी देखील विविध अभ्यासपूर्वक नियोजन करून फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवू शकतो ; प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद देसाई
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-०९ :- ग्रामीण भागातील शेतकरी देखील विविध अभ्यासपूर्वक नियोजन करून फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवू शकतो हे राज्याचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झालेल्या प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद देसाई यांनी दाखवून दिले आहे. उच्चशिक्षित असूनही शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीतूनही आर्थिक समृद्धी मिळविणारे देसाई यांच्या कार्याचा आदर्श नोकरीच्या मागे धावणाऱ्या युवा पिढीने घ्यावा असे कौतुकोद्गार पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांनी येथे काढले.
प्रगतशील शेतकरी देसाई यांना फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती सौ. सावंत बोलत होत्या.
यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, तालुका कृषी अधिकारी माधुरी मुटके, बांदा मंडळ कृषी अधिकारी रूपाली पापडे, प्रगतशील शेतकरी राजाराम मावळंकर, माजी सभापती भगवान देसाई, ग्रामपंचायत सदस्या उमांगी मयेकर, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, शारदा नाटेकर, विस्तार अधिकारी एकनाथ सावंत, प्रकाश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती सावंत यांच्या हस्ते देसाई दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार हा मानाचा समजला जातो. राज्यपाल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. श्री देसाई यांनी बांदा व पारपोली येथे मोठ्या प्रमाणात काजू, आंबा, नारळ, सुपारी, पपई, केळी, मिरी, बांबू, शेवगा यांची लागवड केली आहे.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना शिवप्रसाद देसाई म्हणाले की, आपला जन्म हा शेतकरी कुटुंबात झाल्याने आपल्याला शेतीची लहानपणापासूनच आवड निर्माण झाली. शेतीशास्त्राची पदवी घेऊन आपण शेतीतच नवनवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आपल्याला प्रगतशील शेतकरी राजाराम मावळंकर, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सावंतवाडी पंचायत समिती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे, कृषी सहाय्यक बाबली गाड, विश्वनाथ शिवपुरे, यशवंत सावंत, अतुल माळी, रसिका वसकर, श्वेता बेळगुंदकर, श्वेता सावंत, ज्योती पवार, शेखअजमुद्दीन सरगुरु आदी उपस्थित होते.

