अक्षय साईलच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल
*अक्षय साईलच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल*
*पोलिसांनी दबावाला बळी न पडता त्वरित कारवाई करावी -मायकल डिसोझा*
सावंतवाडी, दि ०५: कोलगाव येथील युवक अक्षय साईल याच्या
आत्महत्येस जबाबदार ठरल्या प्रकरणी सावंतवाडी पोलीसांनी तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील काही सावंतवाडीतील तर अन्य संशयित मुंबईतील आहेत. झालेला प्रकार कळताच संशयित फरार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान त्याचे वडिल जनार्दन शिवराम साईल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजित मठकर, परवेज शेख, सलीम सय्यद, तेजस पोतदार, संकेत माळी, शामू, प्रशांत पडते, प्रशांत पवार व अज्ञात असे मिळून १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात संशयित असलेल्या संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी. काही झाले तरी पोलिसांनी दबावाला बळी पडू नये, अन्यथा कोलगाव ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक मायकल डिसोजा यांनी दिला आहे.
आज सकाळी अक्षय याचा मृतदेह धरण परिसरात आढळून आला. तत्पूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत १२ जणांचा समावेश होता. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार भाड्याची गाडी घेतल्यामुळे घडला. ती गाडी कोलगावातील प्रशांत पडते यांनी घ्यायला सांगितली होती. त्यांचे मुंबईतील मित्र परवेझ शेख, तेजस पोतदार व इतर चार जणांना फिरण्यासाठी गाडीची गरज असल्यामुळे गाडी ठरवून दे असे पडते यांनी सांगितले होते. त्यानुसार पडते यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्यावरून त्याच्या ओळखीचा मित्र अजित मठकर यांच्याकडून ही गाडी ठरवून दिली होती. त्यानंतर मुंबईतील ते सगळेजण भाड्याची गाडी घेऊन फिरायला गेले. मात्र कुडाळ परिसरात या गाडीचा अपघात झाला व गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान वा यावेळी तक्रार करू नको आम्ही काय ते बघतो. इन्शुरन्स करुन घेतो, असे परवेज यांनी सांगितले. मात्र नंतरच्या काळात त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. मात्र दरम्यानच्या काळात मठकर याने नुकसान झालेल्या गाडी मोठी आपले ७ लाख ८० हजार चे नुकसान झाले आहे ते पैसे आपल्याला दे, असे सांगून तगादा लावला. यावेळी त्याने ५ लाख ३० हजार रुपये दिले. परंतु उर्वरित २ लाख ५० हजार रुपये दे असे सांगून मठकर याने त्याला वेळोवेळी त्रास दिला.
त्यामुळे अक्षय अस्वस्थ झाला. यावेळी माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी काय करू? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी अजित मठकर व त्याच्या अन्य मित्रांनी त्याला बोलावून घेऊन मारहाण केली. मारहाणीनंतर अक्षय हा मानसिक तणावाखाली आला. त्यामुळे त्याने आपल्या बहिण अक्षता हिच्या अकाउंट मधील ७० हजार रुपये काढून त्याला पुन्हा दिले. परंतु त्या काळात त्याला नैराश्य आल्यामुळे त्याने आत्महत्या केली. तत्पूर्वी चिठ्ठी देऊन ठेवल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला तर घटनास्थळी गाडी आढळून आल्यामुळे त्याने माडखोल धरणात उडी घेतल्याचे उघड झाले. त्यानुसार त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तब्बल १० ते १२ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यावर पुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

