शिंदे गटात जाणारे ओवाळून टाकलेले
शिंदे गटात जाणारे ओवाळून टाकलेले
राणेंनी बॉडीगार्ड बाजूला ठेवून फिरुन दाखवावे :गौरीशंकर खोत
कणकवली १५ सप्टेंबर-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हस्तक झाले आहेत.जे भाजपला आवश्यक आहे,तेच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटात जाणारे ओवाळून टाकलेले आहेत.हे अस्थिर सरकार आहे,पालकमंत्री नसल्याने विकास रखडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला अंगावर घेऊ नये. राणेंनी बॉडीगार्ड बाजूला ठेवून फिरुन दाखवावे, असे खुले आव्हान शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी दिले आहे.
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक ,जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत ,शिवसेना युवा नेते संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड ,प्रथमेश सावंत, गितेश कडू,अल्पसंख्यांक जिल्हाप्रमख मज्जिद बटवाले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेला.त्याला जबाबदार राज्य सरकार आहे.एकनाथ शिंदे यांचे हे अपयश आहे. महाराष्ट्रातील एक लाख तरुणांचा रोजगार गुजरातने पळवला आहे.केंद्रातील सरकारच्या इशारावर शिंदे सरकार काम करत आहे. या सरकारचा शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो.त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चागले काम करावे. छोट्या मोठ्या विषयांकडे राणेंनी लक्ष देऊ नये.भारतीय जनता पार्टीत आपल्याला किती किंमत आहे ?आणि शिवसेनेत किती होती ?याचा विचार नारायण राणे यांनी करावा.शिवसैनिकांना रस्त्यावर फिरु देणार नाही अशी धमकी देण्याऐवजी स्वतः व आपल्या मुलांचे बॉडीगार्ड बाजूला ठेवून महाराष्ट्रात फिरून दाखवावे, असे आव्हान शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी दिले. शिवसेनेने नारायण राणेंचा सिंधुदुर्ग आणि मुंबईत देखील दोन वेळा पराभव केलेला आहे,असे गौरीशंकर खोत यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटात शिवसैनिक सामील होत आहेत. शिंदे गटात सामील होणारे शिवसैनिक हे ओवाळून टाकलेले शिवसैनिक आहेत, त्यांच्या घरातले देखील त्यांना विचारत नाहीत. आम्ही खासदारांना सांगत होतो, यांना काढून टाका,असे गौरीशंकर खोत म्हणाले.

