◾प्रशासनाने लादलेल्या ‘तुघलकी’ कर्फ्युमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे होणार हाल..
◾माणगाव खोऱ्यातील बहुतांश पोल्ट्री व्यावसायिकांना बसणार फटका..
◾शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार ; मनसेचा सवाल
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴 कुडाळ, दि-०८ :- गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पोल्ट्री व्यावसायिकांना कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थितीमुळे मोठया आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील जनतेवर तालुका प्रशासनाकडून लादल्या गेलेल्या तुघलकी “संचारबंदी”चा मोठा फटका माणगाव खोऱ्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे.गेल्यावर्षी देखील लाखोंचं नुकसान सहन करून संघर्षमय जीवन जगत असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांवर कर्फ्युच्या निमित्ताने स्थानिक प्राधिकारणांनी बेकायदेशीर बंधनं घातल्यामुळे त्यांच्या अडचणींना अधिकच वाढ झालेली आहे. मागील वर्षी लाखोंचे नुकसान होऊन शासनाकडून “दमडीची” मदत मिळाली नाही याउलट यावर्षी बेकायदेशीर बंधनं लादून अधिकचे नुकसानास कारणीभूत ठरत आहे. एकीकडे गतवर्षी लाखोंचं नुकसान होऊन देखील ग्रामपंचायतींनी दिवाबत्ती,घरोपट्टी,पाणीपट्टी अशा माध्यमांतून जबरदस्तीने वसुली पूर्ण केली, महसूल विभागाने जमीन विषयक कर आकारणी तंतोतंत वसूल केली तर वीज वितरण कंपनीने लाइट जोडणी कट करण्याची धमकी देऊन पूर्ण वीज बिल भरून घेतले तर दुसरीकडे जनता कर्फ्युच्या आडून बेकायदेशीर बंधनं घालून आमच्या पोटावर लाथ मारण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे अशी पोल्ट्री व्यावसायिकांची भावना आहे. शासनाचे कोविड 19 विषयक सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून देखील
कृषी पूरक व्यवसायांवर अशा प्रकारे मनमानीपणे बंधनं घातली जात असतील तर जिल्हा प्रशासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करीत असून मा.पालकमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन पोल्ट्री व्यवसायिकांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष व ग़ामपंचात सदस्य बाबल गावडे यांनी केले आहे.

