| कोलगावात मुन्नाभाईच्या टोळीची घुसखोरी! कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर – हाय होल्टेज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तंग**
कोलगावात मुन्नाभाईच्या टोळीची घुसखोरी!
कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर – हाय होल्टेज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तंग**
सावंतवाडी प्रतिनिधी |
कोलगाव परिसरात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुन्नाभाईच्या टोळीची रात्री-अपरात्री सुरू असलेली घुसखोरी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण करत आहे. रात्रीच्या अंधारात पैशांचा हैदोस, संशयास्पद हालचाली आणि अनोळखी तरुणांची टोळी परिसरात फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, जागृत ग्रामस्थांनी रात्री-अपरात्री फिरणाऱ्या अनोळखी तरुणांच्या टोळीला पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, कारवाई न करता पोलिसांनी कानाडोळा केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या निष्क्रियतेमुळे पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून “पोलीस मूग गिळून गप्प का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला असून, त्वरित कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार व्यक्त केला आहे. पोलिसांनी वेळेत दखल न घेतल्यास कोलगावात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या सगळ्या घडामोडींची वेळ अत्यंत संवेदनशील ठरत आहे. कारण, कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार महेश सारंग विरुद्ध अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा अशी ‘हाय व्होल्टेज’ लढत रंगली आहे.
एकीकडे महेश सारंग यांच्या पाठीशी भाजप–शिवसेना महायुतीची महाशक्ती, तर दुसरीकडे मायकल डिसोजा यांच्या मागे अदृश्य शक्ती उभी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
महाशक्ती जिंकणार की अदृश्य शक्ती?
याच उत्तरासाठी संपूर्ण कोलगावची नजर आता ९ फेब्रुवारीकडे लागली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तंग होत चालले आहे.
कोलगावात नेमकं चाललंय तरी काय?
हा प्रश्न आता सर्वसामान्य ग्रामस्थांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

