कोकणसिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रुपाने कोकणाला उज्वल भवितव्य : दीपक केसरकर

 

खासदार विनायक राऊत यांचे थोडेच दिवस शिल्लक

 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी केलेले कार्य हे अनन्यसाधारण असेच आहे. कोकणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तर उद्धव ठाकरे व विनायक राऊत हे कोकणसाठी काहीच करू शकले नाहीत. त्यामुळे विनायक राऊत यांचे आता थोडेच दिवस शिल्लक राहिले असून ना. राणे यांचा विजय निश्चित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील मंत्रिमंडळात त्यांचे मंत्रिपद निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने कोकणाला उज्वल भवितव्य आहे, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री दीपक केसरकर बोलत होते.

यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुरेश गवस, भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात त्यांनी कोकणासाठी काहीही केले नाही. साध्या काजू धोरणाची देखील त्यांनी अंमलबजावणी केली नाही. खासदार विनायक राऊत हे देखील मागील दहा वर्षात कोकणचा विकास करण्यासाठी सपशेल अपयशी ठरले. केवळ प्रकल्पांना विरोध करण्याचच काम त्यांनी केलं. त्यामुळे येथील जनतेमध्ये विनायक राऊत यांच्या बद्दल प्रचंड नाराजी असून त्यांचा पराभव निश्चित आहे असा पुनरुच्चार केसरकर यांनी केला.

कोकणाचे परिवर्तन हे केवळ नारायण राणे यांच्यामुळेच झाले आहे. दोडामार्ग व वैभववाडी तालुक्याची निर्मिती त्यांनी केली. या जिल्ह्यात १९९० साली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्री मुख्यमंत्री तसेच आता केंद्रीय मंत्री या सर्व पदांच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्ग सह कोकणात विकासाची गंगा आणली. रोजगार क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. केंद्रीय मंत्री या नात्याने ओरोस येथे त्यांनी ट्रेनिंग सेंटर आणले असून त्या माध्यमातून अनेक युवकांना व महिलांना प्रशिक्षण प्राप्त होणार आहे. तर दोडामार्ग येथे लवकरच ५०० हून अधिक कारखाने सुरू होणार असून त्या ठिकाणी मेडिकल इक्विपमेंट तसेच विविध मशिनरींबाबत चे उद्योग सुरू होणार आहेत. या सर्व उद्योगांच्या माध्यमातून येथील बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोकणातील ही विकासाची गंगा अखंडित ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना येथील जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दिल्लीच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंनी कोकणचे नेतृत्व केलं आहे‌. पुन्हा एकदा त्यांनी शपथ घ्यावी अशी कोकणातील तमाम जनतेची इच्छा आहे. त्यामुळे येथील जनता त्यांना भरघोस मतांनी निवडून देत मोदींच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा पाठवणार आहे.

येथील रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात येत आहे. सिंधुदुर्गतील लोकांना रोजगारासाठी गोव्याला जाव लागू नये यासाठी पुढाकार घेतला आहे. २०० कोटींचा प्रकल्प इथे होत आहे. उद्धव ठाकरे, विनायक राऊत दहा वर्षांत काहीही करू शकले नाहीत. नारायण राणे यांनी या जिल्ह्याच्या कोकणच्या विकासासाठी मोठ योगदान दिलं आहे‌.

विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. ते अपघातानं खासदार झाले आहेत. आता त्यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला.

 

 

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचे डिपॉझिट जप्त करणार : ना. नारायण राणे

 

मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ मोदींच्या नावामुळे निवडून गेलेले खासदार विनायक राऊत आता भाजपच्या विरोधात बोलू लागले आहेत. मागील दहा वर्षात कोणतेही काम करू न शकलेले राऊत विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त करणार असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!