कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘शुद्ध पाण्याची’ भेट!

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘शुद्ध पाण्याची’ भेट!

सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते दोडामार्ग केंद्र शाळेत वॉटर प्युरिफायर वितरण; ९६ विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षित पिण्याचे पाणी

दोडामार्ग, दि. ०९ : जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. १ येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वॉटर प्युरिफायर वितरण समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते शाळेला वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला. या सुविधेमुळे शाळेतील तब्बल ९६ विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सुरक्षित पिण्याचे पाणी आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे. याच सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘मशीन नाही, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली’
यावेळी बोलताना सौ. वेदिकाताई विशाल परब म्हणाल्या, “आज आपण इथे केवळ एक मशीन देत नाही आहोत, तर आपल्या मुलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया घालत आहोत. ग्रामीण भागात अनेकदा पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.”
“शाळेतील प्रत्येक विद्यार्थी निरोगी राहावा, चांगले शिक्षण घ्यावे आणि भविष्यात आपल्या गावाचे, आई-वडिलांचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करावे, हीच मनापासून इच्छा आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी अशाच प्रकारचे उपयुक्त उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहील,” असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ठरला उपक्रमाचे यश
वॉटर प्युरिफायर उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार असल्याने शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.
‘निरोगी शरीरातच निरोगी विचार’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील ९६ विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा फायदा होणार असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. एकता एकनाथ नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुमित गोपाळ दळवी, श्री. रंगनाथ गवस, सर्व शिक्षकवर्ग, ग्रामस्थ तसेच सहकारी उपस्थित होते. उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!