राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्यावरून काँग्रेस आक्रमक; “लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही- साक्षी वंजारी
राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्यावरून काँग्रेस आक्रमक; “लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही- साक्षी वंजारी
सावंतवाडी –
राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याच्या घटनेनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तीव्र संताप व्यक्त करत संबंधित कृत्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. “ही केवळ निषेधाची कृती नसून लोकशाहीचा उघड अपमान आहे,” अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली.
काँग्रेसने स्पष्ट केले की, मतभेद असू शकतात; परंतु द्वेष, असहिष्णुता आणि हिंसक प्रवृत्ती पसरवणे हे लोकशाही व्यवस्थेला घातक आहे. “पुतळे जाळून विचारांची लढाई जिंकता येत नाही. अशा प्रकारच्या कृतींमुळे समाजात तणाव निर्माण होतो,” असे काॅग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
त्यांनी पुढे असेही हटले आहे की, धमक्या, भीतीचे राजकारण किंवा दडपशाहीच्या माध्यमातून काँग्रेसला झुकवता येणार नाही. “आम्ही भारतीय संविधानावर विश्वास ठेवतो आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच या घटनेविरोधात लढा देऊ. लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आमचा संघर्ष अधिक जोमाने सुरू राहील,” असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

